Tuesday, 28 October 2025

डिजिटल दिवाळी


            दिवाळी ही खरी एकत्र येण्याची असते. एकमेकांना वेळ देता आला, गप्पागोष्टी झाल्या, सुखदुःखे वाटली गेली की दिवाळी साजरी होतेच. यामुळे दिवाळी ही वर्षातून अनेकवेळा साजरी होऊ शकते. पण ती न साजरी होण्याची कारणे अनेक आहेत. हेवे-दावे-दुरावे, परस्पर स्पर्धा, इर्षा आणि यामुळे संवाद न होणे अशी काही कारणे आहेत. एखाद्या वाक्यातील गर्भित अर्थ किंवा मतितार्थ लक्षात न घेणे हे देखील एक कारण आहे. याला कारणीभूत ठरतो तो पूर्वग्रह. एकाने बोललेले एखादे वाक्य त्यातील चांगला वाईट उद्देश लक्षात न घेता स्वतःच्या पूर्वग्रहाने, आकलनाप्रमाणे वेगवेगळे अर्थ बांधले गेले कि संपलेच! अर्थाचा अनर्थ व्हायला फार वेळ लागत नाही. यामुळेच एखाद्या वाक्यातील तिखटपणापेक्षा त्यामागचा उद्देश किंवा हेतू लक्षात घेणे जास्त महत्वाचे आहे.

        सध्याच्या डिजिटल युगात हे तर अधिकच अवघड होऊन बसले आहे. कारण पूर्वीच्या काळी किंवा ज्यावेळी आपण एकमेकांना समक्ष भेटतो आणि बोलतो, तेव्हा चर्चेतला, संवादातला स्वर आणि भाव लक्षात घेणे सोपे जाते, यातून गैरसमज होण्याचा धोका कमी होतो. फेसबुक आणि Whatsapp च्या जगात हे खूप अवघड होऊन बसले आहे, कारण इथे फक्त वाक्य दिसते, बाकी त्यामागचा भाव आणि हेतू हा वाचणारा माणूस त्याच्या मताप्रमाणे, आकलनाप्रमाणे लावू शकतो. यामुळेच सध्या whatsapp सारख्या ग्रुपवर अनेक तंटे होताना दिसतात, रुसवे फुगवे वाढतात. एखादी फॉरवर्ड केलेली पोस्ट किंवा स्वतःहून काहीतरी लिहलेले एखाद्या ग्रुपवर टाकल्यानंतर, पोस्ट करणाऱ्याच्या मनात जरी काही उद्देशपूर्ण किंवा जाणीवपूर्वक नसेल तरीही मोठ्या ग्रुपमधील १ - २ व्यक्ती तरी याने किंवा हिने हे माझ्याबद्दलच पोस्ट केलं आहे असा अर्थ लावू शकतो. तिथून पुढे तो मनात तेढ धरून राहतो आणि याचा बदला कसा घेता येईल याचा विचार करत राहतो. बऱ्याचदा पोस्ट करणाऱ्याच्या मनात तसा काही उद्देश नसतो. आणि जी माणसे खरोखरच असे काही हेतुपुरस्पर करतात ती मनानेच वाकडीच असतात यामुळे यांचा आपण विचार करणेच चुकीचे आहे आणि स्वतःच्या आरोग्यासाठीही ते अपायकारक आहे. यामुळेच सध्या अश्या प्लॅटफॉर्मवर खूप जपून लिहावं / पोस्ट करावं लागतं, कुणाचं मन दुखावलं जाऊ नये याची विशेष काळजी घ्यावी लागते. कुणाचं बोललेलं, लिहलेलं, पोस्ट केलेलं स्वतःच्या जिव्हारी न लावून घेणं हेही एक कसब आहे आणि ही कला आत्मसात करून घेणं अत्यंत आवश्यक आणि फायदेशीर आहे.

        जुन्याकाळची दिवाळी हि खरंच छान होती कारण इथे पैस्याचा अवास्तव फोफाटा नव्हता, घराच्या बनलेल्या फराळातच सुख दिसायचे. हल्ली बाजारातून वेगवेगळ्या मिठाई, गुलाबजामून, बासुंदी इत्यादी गोष्टी केव्हाही घेता येतात, म्हणून घरी या एकत्रपणाने बनवलेले लाडू, चिवडा, पेढा,  कानुला (करंजी), चखली इत्यादी यांचा मान थोडा हरवला असेल. खूप जास्त फटाके लावण्यापेक्षा, खूप महाग कपडे घालण्यापेक्षा, एकमेकांना काहीतरी देण्यामध्ये आणि एकत्र येण्यामध्ये आनंद जास्त आहे हे उमगले पाहिजे. आमचं - तुमचं करत रहाणे हा एक मोठा रोग आहे आणि या रोगामुळे आपुलकी आणि जिव्हाळ्याचा जीव जातो, हे सत्य आहे. येणाऱ्या भविष्यात आपण सर्वजण एक उत्तम, आनंदमय, जिव्हाळ्याची, प्रेमपूर्ण आणि अर्थपूर्ण अशी दिवाळी साजरी करू शकू अशी इच्छा आणि प्रार्थना करतो.

Thursday, 30 December 2021

चाटण


काय बोलावं या वर्षाबद्दल, २०२१ हे साल माझ्यासाठी नक्कीच अविस्मरणीय असे राहणार आहे. संपूर्ण वर्षभरात आंबट, तिखट, गोड, खारट, तुरट अशा नानाविध चवी या वर्षाने मला खाऊ घातल्या, नव्हे त्या चाटवल्या. काही अत्यंत जहाल तर काही तितक्याच मधाळ. वर्ष सुरू होण्या थोडंसं आधीच एक भला मोठा चमचा माझ्या घश्यात काहीतरी भरवून गेला. विषच ते, चव समजण्या आधीच संपूर्ण जीभ पोळून निघाली आणि पोटात तर वणव्यानेच पेट घेतला. नाक, तोंड आणि डोळ्यातून पाणी येत असतानाच, कुणी भरवला असेल तो घास म्हणून शोधायला गेलो तर विधिलिखिताचा एक अस्पष्ट, अदृश्य असा हात त्या चमच्यामागे मला दिसला. जवळचे म्हणजे माझ्या अगदी जवळचे लोक हातात पाणी घेऊन माझ्या दिशेने धावले, नुसत्या पाण्याने थंडावेल असे ते जहरच नव्हते..त्यांचे भाजलेले हातही मला दिसत होते. जीवाचा आटापिटा करून ते सारं पचवायचा आणि थंड करण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्या विषाला शरीराच्या आतच घुसमटून दामटून टाकले. पुढील काही महिन्यात असे समोरून येणारे, न आवडणारे, न पटणारे, मनाला हैराण करून सोडणारे, जहरसदृश्य चमचे यायचे काही थांबले नाहीत. प्रत्येक चमच्यासोबत ते विधिलिखित मला विचारीत होते "हे पचवू शकशील ?" मी माझ्या शरीरातील शक्ती एकवटून काही पाचकरस शरीरातच उत्पन्न केले, ते म्हणजे होते, आशा, धीर, हिम्मत, सहनशीलता, विवेक आणि निश्चय. या रसांपुढे आणि माझ्या मदतनीसांच्या प्रयत्नांपुढे ते हलाहल अखेर वितळले आणि सहा महिन्यांचा तो तिखट, असहनीय, बैचेनीपूर्ण, जीवाची काहिली करून सोडणारा, प्रदीर्घ असा भासणारा तो विषारी कालावधी अखेर संपला आणि त्या हलाहलाचीच शेवटी साखर झाली आणि माझ्या जीवेवर रेंगाळली.

पुढील सहा महिन्यात माझ्या उपेक्षित आणि जखमी जीभेवर खूपसारी मलमपट्टी झाली. चमच्यातून येणारे जिन्नस बदलले होते आणि विषाची जागा अखेर मधाने घेतली. मी आता डोळे पुसून, त्या चमच्यामागे पुन्हा एकदा निरखून पाहू लागलो तेव्हा मला तो निर्भाव, अविचल आणि एरवी चेहऱ्यावर कसलेच भाव न दाखवणारा, पाषाणस्वरूप विधिलिखिताचा चेहरा नकळत स्मितहास्य करत असल्यासारखा भासला ! आता हे वर्ष पाठमोरे होत असताना, अगदीच काही त्याचा हात पकडावा, त्याला उराशी कवटाळावे...आणि  'इतक्यात जाऊ नकोस रे बाबा.. !' असे हट्टून सांगावे असे काही वाटत नाही. पण याने मला देऊ केलेले हे तिखटगोड 'चाटण' लक्षणीय अर्थाने तर्हेवाईक होते आणि ते माझ्या स्मरणात कायम राहील.

Tuesday, 26 January 2021

सांधा

आपली मुलं खूप मोठी व्हावीत ही सर्वच मोठ्यांची इच्छा असते. हीच मुलं मोठ्यांच्यात वावरताना मात्र छोट्या मुलांसारखीच वागावीत, त्यांनी लहानांना शोभणारी मिश्किल वर्तने करावीत, असाही त्यांचा गमतीशीर हट्ट असतो. मोठ्यांच्या बैठकीत त्यातल्या त्यात एखादं समजूतदारपणाची कडा असणारं काही भाष्य त्यांनी केलंच तर मोठ्यांचे डोळे विलक्षण मोठे होतात. अर्थात, मोठ्यांसमोर (त्यांच्या तुलनेने) लहान असलेल्यांनी तोंड उघडू नये, या विचारात काही वावगे आहे असे मला म्हणायचे नाही. पण खूपदा "आम्ही मोठे आणि तुम्ही 'अजूनही' छोटेच !" या गळाचेपीत या छोट्यांचे भाव आणि स्वर दोन्ही दडपले जातात ! त्यांना हवी ती लय सापडत नाही आणि तुम्ही छोटे ते कायम छोटेच राहणार हेही बजावलं जातं. बऱ्याचदा या छोटे-मोठेपणात 'वय' हाच प्रमुख वर्चस्व गाजवतो आणि एकाद्या चर्चेतील खरेखोटेपणाच्या तथ्यापेक्षा मोठेपणातील 'मी'पणा हेकेखोरी करताना दिसतो.

आपणास आपल्या आईशी केव्हाही जवळीक साधता येते, वडिलांशी मात्र तसे नसते, त्यांच्याशी आधी खूप छोटे असताना (कारण आपले बोलच तेव्हा बोबडे असतात त्यांनी कोणाला इजाच होत नाही) आणि नंतर स्वतःच्या पायावर उभे राहिल्यानंतर (तेही कदाचीत, कुंडलीत योग्य असतील तर) जवळ येता येते, मोकळेपणाने बोलता येते. मधल्या काळात आपल्या जीभेची गुंडाळी करून ती घश्याच्या आत बांधली तरच ती एकसंध राहते. अशी एक सर्वसाधारण आपल्या आसपासच्या भागातील बहुतांश वर्गाची जनरीत आहे. याला अपवाद नाहीत अश्यातला काही भाग नाही, बड्या घराच्या मुलांना हि मुभा मिळते. हा मधला काळ मूग गिळून काढल्यानंतर काही मुले ठराविक वयात आपल्या वडिलांशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतात. मित्र नात्याने त्यांच्यासमोर बंद तोंड उघडू पाहतात. यावेळी मात्र मोठ्यांचे वय आणि मान यांनी फार मान वर काढली नाही तरच तिथे चर्चा रंगते आणि संवाद होतो. नाहीतर यातील शुल्लक गोष्टी वयस्क अहंपणाच्या जिव्हारी लावून घेऊ शकतात आणि चर्चेऐवजी तंटा होऊ शकतो. वयस्क म्हणजे परिपूर्ण हि परिभाषा असलेल्या मोठ्यांना लहानांनी कसलेही शहाणपण शिकवलेले पचत नाही. मोठ्यांचे मोठेपण आतून कमकुवत असू शकते, मोठेपणाला इजा सहन होत नाही. काही मोठ्यांशी मैत्री होणे अशक्यच असते कारण मैत्रीपूर्ण संवादासाठी धरती एक असावी लागते. काही हुशार वडील ठराविक वयानंतर ती स्वतःहून करून घेतात. खूपजनांना ते जमत नाही, अश्या हट्टी वडिलांना कोल्हापुरी भाषेत 'खवट' आणि पुणेरी भाषेत 'कडू' संबोधले जाते, अर्थात त्यांच्या माघारी !

आयुष्याचा गाडा ओढत असताना आपली मुले एव्हाना बऱ्यापैकी मोठी झाली असावीत, हे कित्तेकदा दुर्लक्षित होते. त्यांच्या विचारांना अन स्वप्नांना एखादी पालवी फुटली आहे का, ती पालवी कशाची आहे, त्याचे रोप होऊ शकते का, खतपाणी घालण्यायोग्य असेल तर त्याला आधार द्यावा का ? कि आपल्या संपूर्ण आयुष्यभराच्या संस्कारांनी आपल्या दृष्टिकोनाचा जो साचा तयार झाला आहे त्यातूनच त्यांच्याकडे पाहत बसावे ? आपल्याच साच्याप्रमाणे त्यांना घडवण्याची धडपड, या साच्याच्या पलीकडचे जे आहे ते चुकीचेच असावे ? हा साचा इतका भक्कम असतो कि तो बदलण्यापेक्षा मुलांना ठोकून चेपवणं सोपं जातं. ते दबावापायी खूपदा या साच्यात मावतातही, पण त्यांचे चेप काही केल्या आयुष्यभर जात नाहीत. मग सळसळत्या वयात आल्यानंतर हेच चेप टेंगूळ बनून बाहेर येतात. यावेळी मात्र मोठ्यांना माया कमी झाल्याची जाणीव होते आणि दोन विश्वे एकमेकात मिसळली जात नाहीत.

आपल्या मुलांना लहान घोषित करत लहानच ठेवण्यापेक्षा, योग्यवेळी आपल्या अनुभवी डोळ्यांच्या देखरेखीखाली त्यांच्या कुवतीची, आत्मनिर्भरतेची एखादी परीक्षा करून पाहिली गेली, ठराविक वेळी त्यांना प्रपंचातील महत्वाचे प्रश्न, निर्णय, आपत्ती यातील सल्लामसलतीत शामिल केले गेले, यातून त्यांचा वेळचे वेळी खांदा तपासाला गेला, ठराविक वयानंतर त्यांना बाबू, पप्पू, छकूली किंवा चमू म्हणायचे सोडून दिले, त्यांना फक्त समोरच्यासारखं किंवा त्यापेक्षा वरचढ बनायचे आहे, हे घोकून सांगत बसण्यापेक्षा, त्यांचा स्वतःचा दृष्टिकोन कसा विकसित होऊ शकतो, याकडे लक्ष दिले गेले, समोरच्या चार चौकटी म्हणजेच काही विश्व नाही, विश्वाचा विस्तार खूप मोठा आहे, ते कापतील तेवढे अंतर थोडे आहे, आपले काम फक्त त्यांच्या पंखांना बळकटी देण्याचे आहे, त्यानंतरची गगनभरारी ही सर्वस्वी त्यांचीच जबाबदारी आहे, हे जाणले तर खऱ्या अर्थाने छोट्यांना मोठे करण्यात यश येऊ शकेल.

असो! हि लहान तोंडी मोठा घास घ्यायची लहर मला आज कशी काय आली काही कल्पना नाही! Computer आणि keyboard काही बोलायला किंवा व्यक्त ह्यायला अटकाव करत नाहीत हेही एक कारण असावे. मोठेपणा फक्त वय व अधिकार यांना बांधून न ठेवलेल्या मोठ्यांना या लेखाचा आणि वयात आलेल्या त्यांच्या लेकाचा फारसा त्रास होऊ नये !

Saturday, 11 July 2020

वर्षा



वर्षातील काही दिवस
असते आमुची तिजोरी भरलेली
अगदी काठोकाठ,
सुवर्णधाराच जणू बरसतात आम्हावर
एका मागून एक लागोपाठ !

वर्षातील काही दिवस
हिरवाईला जणू येतो मोहर,
सृष्टीच म्हणते लाजून 
हा डामडौल थोडा तरी आवर !
एक एक तृण अन पाती 
बनते थोडीशी धीट,
सडपातळच जरी
नाही कोणास भीत !

वर्षातील काही दिवस
सुखाला उरत नाही पारावार,
धुंद डुंबत असतो आम्ही
सुवर्ण डोहात वारंवार  !
साम्राज्याचे वैभव पाहून
फुलू पाहतो माझा श्वास,
थोड्या दिवसांचा का होईना
राजा असल्याचा होतो मज भास ! 

Sunday, 17 May 2020

आपत्तीची देणगी !


आज मनुष्याकडे कश्याची कमतरता आहे ? किती बलशाली आणि बलाढ्य आहे हा इतरांच्या तुलनेत! समुद्रावर जमीन अंथरून यावर आपली वसाहत निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे याच्यात. फक्त वीटेवर वीट रचून गगनाच्या काळजात घुसणाऱ्या इमारती यानेच तर बनवल्या. याच्या भ्रमण मार्गात आडवा आलेला पर्वत देखील भेदून, पोखरून अलीकडून पलीकडे क्षणात पोहोचला हा! नुसत्या गुरगुरण्याने अंगाचा थरकाप उडवणारा वाघ, सिंह यासारख्या हिंस्र श्वापदांना नुसत्या बोटांच्या इशाऱ्यावर याने रिंगणात नाचवले! क्षणात शहरेच्या शहरे उध्वस्त करू शकणारी स्फोटके आहेत याच्याकडे. शेकडो मैलो दूर केवळ शुभ्र ठिपक्याप्रमाणे दिसणारा चंद्रसुद्धा पादाक्रांत केला याने! इतकेच काय करोडो मैल दूर उघड्या डोळ्यांनीही न दिसणाऱ्या मंगळाला सुद्धा धडक दिली याने ! एवढे सामर्थ्य असून देखील आज हा महापराक्रमी योद्धा डोळ्यानीही दिसू न शकणाऱ्या छुद्र विषाणू समोर हतबत का बरे व्हावा? निसर्गाने एक छोटासा कारनामा केला आणि त्यापुढे या सर्वश्रेष्ठ, महापराक्रमी, सर्वशक्तिशाली मानवाला आपल्या बिळात दडून बसण्यास भाग पाडले! निसर्गाने दाखवून दिले कि, हा मानव जो भूतलावर ज्या ज्या गोष्टी करतो आणि ज्यांना तो पराक्रम म्हणून मिरवतो, त्या सृष्टीच्या तुलनेत केवळ अंशमात्र आहेत. हाच तो धडा, जो मानवाला इशाऱ्याने सांगत आहे कि तो स्वतः निसर्गापेक्षा मोठा होऊ शकत नाही ! हाच तो कारनामा कि जो माणसाच्या बेफिकीर आणि दिशाहीन वाटचालीत धुंद आणि मश्गुल झालेल्या डोळ्यांना आज डोळस होण्याची ताकीद आणि संधी देत आहे.

लॉक डाउनचा काळ आज आपणास अनेक अर्थपूर्ण उकली करून देत आहे. जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही आणि आयुष्यात अकल्पनीय गोष्टीही घडू शकतात याचे भान दिले. ज्या रोजच्या मळकटलेल्या वाटेवरून आपली रडतखडत पायपीट सुरु आहे, ज्यातून आपली कधीही सुटका नाही अशी तक्रार आणि समजूत जी आपण आजवर केली, तीही बदलायची वेळ या वेळेने आणली ! इतका मोठा बदल होऊ शकतो हे कोणाच्या ठायी कधीही नव्हते ! बदलत्या वेळेसोबत आपणही योग्य ते बदल अंगिकारले पाहिजेत हेही यातून समजले. काही बदल जसे कि, शहर आणि गाव यातील खोलाच खोल वाढत चाललेली दरी, यातील समतोलतेचा अभाव आणि यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या या आजाराने निदर्शनास आणून दिल्या आहेत. गावाकडील लोकांची रोजगारासाठीची शहराकडे धाव आणि शहरातील लोकांची कोंदटलेल्या श्वासातून मुक्ततेसाठी गावाकडे धाव, हि पळापळ थांबवणे अत्यावश्यक आहे.

आणखी एक उकल म्हणजे, आपल्या अमर्याद आणि अनावश्यक गरजांचा जो भ्रम आपण निर्माण करून ठेवला आहे, तो केवळ भ्रमच आहे. हि म्हणजे चालू घडीतील लोक जे करत आहेत त्याचे जसेच्या तसे अनुकरण करण्याचा अट्ठाहास आणि निरर्थक धडपड आहे. वास्तविक आयुष्य जगण्याच्या गरजा किती कमी आहेत! पण नाही! आपली हाव अशी आहे कि, जे भवतालचे उपभोगत आहेत ते आपणही भोगलेच पाहिजे. कुणी अमका परदेशी फिरतोय तर मलाही फिरलेच पाहिजे. कोणी अमुक काहीतरी खातोय, ते केवळ नजरेने चविष्ट दिसणारे पक्वान असले आणि शरीरास त्याचा उपयोग नसला तरी, ते मीही गिळलेच पाहिजे. अश्या अनेक गोष्टी! हे करण्यात काही चुकीचे आहे असे नाही, पण या अनुकरणासाठी, नकलीसाठी आपण कोणत्या गोष्टी पणाला लावत आहोत, हे पाहायला नको का !

उत्क्रांतीने बरीच वर्षे मेहनत घेऊन आपणास पशु पासून माणूस बनवले, समज आणि संवेदना दिली, तरीही आपल्या आहारात आपण पशु आणि रानटी वृत्तीच दाखवली, निसर्गात उपलब्ध असलेल्या सर्वच गोष्टी-जीव माणूस पचवू शकत नाही हे त्याने दाखवून दिले आहे. आता मात्र उपचाराच्या वाटेवर कबुतराच्या चोचीप्रमाणे एक एक कण आपण निवडून खाऊ लागलो आहोत ! शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याची गरज, त्यासाठीचा समतोल आहार आणि आवश्यक व्यायाम याचे धडे आपण घेऊ लागलो आहोत.

आज आपण त्या लोकांशी संवाद करत आहोत, ज्यांच्याशी आपणास बोलण्यासाठी पुरेसा वेळ नाही हि सबब आपण नेहमी पुढे केली ! क्षुल्लक बाबी मनात ठेवून अबोला केला, यामध्ये मग मित्र परिवार, नातेवाईक, मग वडील, आई, भाऊ, बहीण आणि इतर यांच्यातील आजवर दुर्लक्षित आणि अव्यक्त संवाद आणि नात्यांतील मर्म याची जाणीव झाली आहे. कोरोनाकडून महत्वाचा शिकण्याजोगा गुण म्हणजे, हा विकार गरीब-श्रीमंत, जातीपाती, वय, लिंग, पत-प्रतिष्ठा यामध्ये दुजाभाव करत नाही, हे पाहून सर्वच लोकांनी समान पातळीवर येऊन एकमेकांची काळजी घेतली पाहिजे, विचारपूस केली पाहिजे, आणि आपण आता तसे करतही आहोत.

मनोरंजन हा आपल्या जीवनाचा एक आवश्यक आणि अविभाज्य घटक असला तरी, आज जाणीव होते कि, आपल्या स्वतःच्या आयुष्याची पटकथा रंजक बनवण्या ऐवजी आपला कितीतरी वेळ आपण सिनेमाच्या कल्पित पटकथा पाहण्यात घालवला! स्वतःच्या व्यक्तिमत्वात पैलू घडवण्या ऐवजी social media वरील रंजक आणि फायदा शून्य बाबींत मन रमवले, यातून आपण खरे काय कमावले ? तंत्रज्ञान आणि ही अनेक प्रसारमाध्यमे मुळीच दुष्ट नाहीत, पण याचा अतिवापर न करता समंजस उपयोग करणे गरजेचे आहे. लॉक डाउनच्या निमित्ताने आपणाला मिळालेली हि फुरसत म्हणजे आपणासाठी आवाहन आहे अश्या प्रकारच्या आपणास हानिकारक आणि अनावश्यक सवयी त्यागण्यासाठीचे, हि आपल्या विशुद्धीकरणाची सुवर्णसंधी आहे.

मुळात कोणताही आजार हा रोग्याला दुर्बल बनवतो आणि आपण आजारातून 'बरे' होतो, पण हा कोरोना नामक आजार माणसाला मानसिक, सामाजिक आणि जीवनाविषयीच्या विविध अंगांवर 'बरे' करत आहे. इतर सर्व भ्रमिक गोष्टींपेक्षा आपले जीवन हे अधिक मोलाचे आहे, हे तो शिकवत आहे. या आजाराकडे शिकवण्याजोगे खूप आहे, यातील किती आणि कोणत्या गोष्टी शिकायच्या हे आपल्या हातात आहे.