![]() |
| (Image courtesy: Internet) |
जूनचा महिना उलटला. धरणीमाता आसुसलेली, तहानलेली. संपूर्ण नभाने गर्भधारणा केलेली. आज नभाला अर्भकाचा भार पेलवेणा. आकाश जड झाले. जमिनीला निरखू लागले, जमिनीच्या ओंजळीचा अंदाज घेऊ लागले. धरणी बरोबर नजरानजर झाली, कित्तेक महिने पाहूनही दुर्लक्ष केलेले, तिच्या डोळ्यात तरारालेले पाणी ते पाहू लागले. तिची उत्कंठा ते जाणून होते. भेटीपूर्वी लडीवाळी करण्याची लहर आली. तिला पाहून थोडे हसले, थोडे मिश्किल झाले. मुद्दामच गुरगुरु लागले मध्येच दात काढून हसू लागले. तिला फुंकर घालू लागले. हलकीशी हितगुज झाली. काळभोर ढगांना एकत्र करून छान आडोसा बनवला गेला. अखेर अवकाशाणे मुठी आवळल्या आणि कडाडणाऱ्या टाहोसह धरणीचेच लेकरू कित्तेक महिने यज्ञ करून शुद्ध करून, पवित्र करून, एका नव्या रुपात तीच्या आसुसलेल्या कुशीत पुन्हा सुपूर्त केले.
मोहरलेली धरणीमाता हाती लेकरू येताच खिदळू लागली, फुलून गेली, नाचूही लागली गाऊही लागली. क्षणार्धात रंग तिने बदलला. मायेचा ओलावा उरी तिच्या दाटून आला. बालस्पर्शाने बालक झाली, चंद्राहूनही शीतल झाली. मृताने पुन्हा एकदा जीवनाचा स्वाद घेतला, धरणीने पुन्हा एकदा श्वास घेतला.
आकाश वरून मायलेकरांचा तो थयथयाट पाहत होते. आनंदाचे द्योतक म्हणून सप्तरंगी कमान रंगवत होते. सर्वच पशू पक्ष्यांनी बालकाचे या स्वागत केले. खेळवायास त्याला किलबिल ते करू लागले. बाळ आता रांगते झाले वाट स्वतःची ते शोधू लागले. डोंगरमामाच्या गावातून प्रवास याचा सुरू झाला. थांबणे काही आता जमेना पळणे फार सोयीचे झाले. हसत खिदळत उड्या मारत झरझर झरझर वाहू लागले. दगडांनाही घाबरेना, पडणे हसणे परत उठणे परत पळणे हा एकच दिनक्रम. सोबतीला नवे सवंगडी मिळाले, दंगा मस्ती आणखीच वाढली. कड्या कपरिंनी थोडी शिस्त लावली, वाऱ्याने धाक दाखवला, अधून मधून याच्या खोडकर प्रवाहाला दिशा तो देवू लागला. प्रवाह मार्गाला लागला पण खळखळाट काही गेला नाही. याच्या खळखळ वृत्तीचं सर्वांनाच फार मोठं कौतुक. स्वभावही निखळ. कोणाचा हेवा नाही, ना कोणाशी वैर, मनी कसला अहंकार नाही, जो भेटेल तो सोबती.
शरीरतत्व असे की जे मिळाले ते ग्रहण केले. कडू गोष्टी आपसूकच किनारी लावल्या. गोड गोष्टी थेंबा थेंबात साठवल्या. काही सवांगड्यांना योग्य ती साथ लाभली नाही, ती वाटेतच आटून गेली, काही हट्टापायी डबकी बनून राहिली. वाहत्या प्रवाहाचा घेर तर वाढतच होता सोबत डामडौलही. मार्गी अनेक पांथस्त आले काहींनी भर घातली तर काही तहान भागवून मार्गस्थ झाले. वेड्यावाकड्या वळणात ज्या ज्या गोष्टींना स्पर्श झाला, जे जे बोल कानी पडले, जे जे पाहिले ते कणाकणात रुजू झाले. सर्व आठवणी थेंब थेंब जपल्या. या आठवणी वाहत्या पाण्याला एक गंध देणून गेल्या. गंधासोबत पाण्यात एक स्वादही ठेवून गेल्या. गंध स्वादासोबत नाव झाले, स्वतःचे अस्तित्व दिसून आले, विशाल झाले, प्रगल्भ झाले, उदात्त झाले, तरी नाळ ती तशीच होती, तिथेच होती, मातेच्या उदाराशी बांधलेली.
अविरत वाहता प्रवास हा घेऊन चालला तरी कुठे? स्वतःपेक्षाही भव्य आहे काहीतरी याची आता समज आली. शेवट आहे सागरापाशी, साद त्याची ऐकू आली. प्रवास झाला आता खूप, अस्तित्व स्वतःचे त्यागून आता पुन्हा थेंब बनण्याची वेळ आली. सागराने कसलाही पक्षपात केला नाही. रुचकर बेचव, योग्य अयोग्य, मधुर कडू, सर्व काही सामावून घेतले. थेंब थेंब एक धुवून घेतला. अढी, बंधने, जबाबदारी, माया, प्रेम आणि सर्व आठवणी मुक्त केल्या, सर्वच हलके होऊन ते बाष्प अवकाशाच्या पुन्हा एकदा हवाली झाले.

