काय बोलावं या वर्षाबद्दल, २०२१ हे साल माझ्यासाठी नक्कीच अविस्मरणीय असे राहणार आहे. संपूर्ण वर्षभरात आंबट, तिखट, गोड, खारट, तुरट अशा नानाविध चवी या वर्षाने मला खाऊ घातल्या, नव्हे त्या चाटवल्या. काही अत्यंत जहाल तर काही तितक्याच मधाळ. वर्ष सुरू होण्या थोडंसं आधीच एक भला मोठा चमचा माझ्या घश्यात काहीतरी भरवून गेला. विषच ते, चव समजण्या आधीच संपूर्ण जीभ पोळून निघाली आणि पोटात तर वणव्यानेच पेट घेतला. नाक, तोंड आणि डोळ्यातून पाणी येत असतानाच, कुणी भरवला असेल तो घास म्हणून शोधायला गेलो तर विधिलिखिताचा एक अस्पष्ट, अदृश्य असा हात त्या चमच्यामागे मला दिसला. जवळचे म्हणजे माझ्या अगदी जवळचे लोक हातात पाणी घेऊन माझ्या दिशेने धावले, नुसत्या पाण्याने थंडावेल असे ते जहरच नव्हते..त्यांचे भाजलेले हातही मला दिसत होते. जीवाचा आटापिटा करून ते सारं पचवायचा आणि थंड करण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्या विषाला शरीराच्या आतच घुसमटून दामटून टाकले. पुढील काही महिन्यात असे समोरून येणारे, न आवडणारे, न पटणारे, मनाला हैराण करून सोडणारे, जहरसदृश्य चमचे यायचे काही थांबले नाहीत. प्रत्येक चमच्यासोबत ते विधिलिखित मला विचारीत होते "हे पचवू शकशील ?" मी माझ्या शरीरातील शक्ती एकवटून काही पाचकरस शरीरातच उत्पन्न केले, ते म्हणजे होते, आशा, धीर, हिम्मत, सहनशीलता, विवेक आणि निश्चय. या रसांपुढे आणि माझ्या मदतनीसांच्या प्रयत्नांपुढे ते हलाहल अखेर वितळले आणि सहा महिन्यांचा तो तिखट, असहनीय, बैचेनीपूर्ण, जीवाची काहिली करून सोडणारा, प्रदीर्घ असा भासणारा तो विषारी कालावधी अखेर संपला आणि त्या हलाहलाचीच शेवटी साखर झाली आणि माझ्या जीवेवर रेंगाळली.
पुढील सहा महिन्यात माझ्या उपेक्षित आणि जखमी जीभेवर खूपसारी मलमपट्टी झाली. चमच्यातून येणारे जिन्नस बदलले होते आणि विषाची जागा अखेर मधाने घेतली. मी आता डोळे पुसून, त्या चमच्यामागे पुन्हा एकदा निरखून पाहू लागलो तेव्हा मला तो निर्भाव, अविचल आणि एरवी चेहऱ्यावर कसलेच भाव न दाखवणारा, पाषाणस्वरूप विधिलिखिताचा चेहरा नकळत स्मितहास्य करत असल्यासारखा भासला ! आता हे वर्ष पाठमोरे होत असताना, अगदीच काही त्याचा हात पकडावा, त्याला उराशी कवटाळावे...आणि 'इतक्यात जाऊ नकोस रे बाबा.. !' असे हट्टून सांगावे असे काही वाटत नाही. पण याने मला देऊ केलेले हे तिखटगोड 'चाटण' लक्षणीय अर्थाने तर्हेवाईक होते आणि ते माझ्या स्मरणात कायम राहील.